भिवंडी : नवी दिल्लीतील डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन तथा आदीलीला फाउंडेशन यांच्या वतीने कवी, लेखक जगदेव भटू यांना यंदाचा राष्ट्रीय समाजगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ सप्टेंबरला नवी दिल्लीत अखिल भारतीय प्रतिभा साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते भटू यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
या संस्थेच्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांना, उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. या वर्षी जगदेव भटू यांना हा मान मिळाला आहे.
जगदेव भटू हे भिवंडी तालुक्यातील शेलार येथे राहत असून, गेल्या २५ वर्षांपासून विविध विषयांवर लेखन करत आहेत. आतापर्यंत त्यांची एकूण तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा सामाजिक, तसेच इतर विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. विविध साहित्य संमेलने, कविसंमेलनांतून आणि सामाजिक कार्यक्रमांतून ते आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, श्रीकृष्ण टोबरे, शिवा इंगोले, विजयकुमार भोईर, वि. जी. पवार, युवा कवी मिलिंद जाधव, मारुती कांबळे, संघरत्न घनघाव, एम. के. वाघ यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, विविध ठिकाणांहून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.